Friday, December 12, 2025

श्वासांमधलं अंतर तू!

श्वासांमधलं अंतर तू
चांदणगच्च अंबर तू

युगायुगांची तहान मी
कातळांतला पाझर तू

संध्याकाळी कातर मी
ज्योती ज्योती सावर तू

महाभारता कारण मी
पार्थाचा योगेश्वर तू

चिंता, शंका, संभ्रम मी
त्या साऱ्यांचं उत्तर तू 


- मंदार.

Monday, October 06, 2025

तू !

आम्ही फुलं रानातली, राजवाड्यातलं कमळ तू
आमची मैत्री बाभळीशी, कल्पवृक्षाजवळ तू !

माळावरचा हरी आता देवळामध्ये गजाआड
बाळकृष्ण तुझ्यापाशी, नंदाघरचं उखळ तू !

शिव्याशाप आमच्या कानी, काट्यांतून काढतो वाट
नीळकंठ होऊन कसा पचवतोस गरळ तू ?

आम्ही लहान खेडेगाव चंद्रमौळी झोपड्यांचं,
कुबेराच्या चांदण्यात झगमगणारं परळ तू ! 

सारवट गाडीखालची आम्ही ओबडधोबड पाऊलवाट
सुखाकडून सुखाकडे राजरस्ता सरळ तू

अवसेच्या या रात्री पुरती ज्योत आमची सावरतो
भयाण अंधारातून आता पहाट होऊन उजळ तू

सेतूसाठी वाळू आमची, द्रोणागिरी उचल तू
गोवर्धनातळी आमच्या, एकीतून उमल तू 

 - मंदार.
 

Sunday, November 10, 2024

दीपावली


तुझ्या मेंदीस चढतो रंग रांगोळीतला
तुझा गंधार कोमल धुंद संगीतातला

​हिरे मो​त्यांसही हसणे तुझे झाकोळते ​
तुझ्या गाली खळ्यांची रोषणाई वेधते

अमावस्येस दिसतो चेहऱ्याचा चांदवा
​फिकी पडते मिठाई काय ओठी गोडवा!

तुझ्या डोळ्यांमध्ये लाखो दिवे तेजाळती
तुझ्या स्पर्शात गात्रे चंदनी गंधाळती

कपाळी कोरली माझ्याच नावे चांदणी
तुझ्या हातात माझ्या प्राक्तनाची लेखणी

तुझ्यासंगे सुखाने रूपगंधे भोगिली
अशी उजळून गेली जीवना दीपावली


- मंदार.

Thursday, October 31, 2024

परापूजा

आदि शंकराचार्यांनी केलेल्या ’परापूजा’ ह्या अतीव सुंदर संस्कृत 
रचनेचा समश्लोकी मराठी भावानुवाद (सुमंदारमाला वृत्तामध्ये).

++++++

मूळ रचना: 


अखण्डे सच्चिदानन्दे निर्विकल्पैकरूपिणि ।
स्थितेऽद्वितीयभावेऽस्मिन्कथं पूजा विधीयते ।।

पूर्णस्यावाहनं कुत्र सर्वाधारस्य चासनम् ।
स्वच्छस्य पाद्यमर्घ्यं च शुद्धस्याचमनं कुत: ।।

निर्मलस्य कुत: स्नानं वस्त्रं विश्वोदरस्य च ।
अगोत्रस्य त्ववर्णस्य कुतस्तस्योपवीतकम् ।।

निर्लेपस्य कुतो गन्ध: पुष्पं निर्वासनस्य च ।
निर्विशेषस्य का भूषा कोऽलन्कारो निराकृते: ।।

निरञ्जनस्य किं धूपैर्दीपैर्वा सर्वसाक्षिण: ।
निजानन्दैकतृप्तस्य नैवेद्यं किं भवेदिह ।।

विश्वानन्दपितुस्तस्य किं ताम्बूलं प्रकल्प्यते ।
स्वयंप्रकाशचिद्रूपो योऽसावर्कादिभासक: ।।

प्रदक्षिणा ह्यनन्तस्य ह्यद्वयस्य कुतो नति: ।
वेदवाक्यैरवेदयस्य कुत: स्तोत्रं विधीयते ।।

स्वयंप्रकाशमानस्य कुतो नीराजनं विभो: ।
अन्तर्बहिश्च पूर्णस्य कथमुद्वासनं भवेत् ।।

एवमेव परापूजा सर्वावस्थासु सर्वदा ।
एकबुद्धया तु देवेशे विधेया ब्रह्मवित्तमै: ।।

- आदि शंकराचार्य. 

++++++

असे विश्वरूपी सदा सर्वभूती उरे व्यापुनी सर्व भूमंडळा
कशी होय पूजा जिथे राहतो ना तयापासुनी कोणिही वेगळा!

समस्तांस आधार आहे तयाला कसे बोलवा अन् कुठे बैसवा 
तया निर्मळाला कसे अर्घ्य देणे, विशुद्धास अन् आचमन पाजवा 

कुठे स्नान स्वच्छास अन् वस्त्र त्याला, उभे विश्व ज्यानेच आच्छादिले
जया वर्ण नाही, जया गोत्र कोठे? तया जानवे घालण्याला दिले!

जया राग-लोभादि लवलेश नाही, फुले गंध त्याला कसे वाहतो 
हिरे माणकांची नि आरास कैसी अरूपी निराकार जो राहतो 

प्रभा सर्व विश्वास ज्याची उजळते, तयाला दिवे लाख होती फिके 
जया अंतरातील आनंद वाहे, तया गोड नैवेद्य सारे फुके!

रमे विश्व आनंदरंगी जयाच्या, तयालाच तांबूल देणे कसे 
उरी चंद्र-सूर्यांस तो जन्म देतो, उजेडातल्या जो उजेडी असे 

जगा लीलया पूर्ण व्यापून राहे, तयाभोवती भक्त कैसा फिरे 
कसे वेद, स्तोत्रांत वर्णा तयाला, स्वभावेच जो वेदमंत्री झरे 

जिथे फाकलेला स्वत:च्या प्रकाशी, तया काय नीरांजने लावणे 
निरोपास त्याला कुठे घेउनी जा? जिथे आत-बाहेर त्याचे जिणे 

अशी ही परापूजनी बुद्धि आता, रमावी स्वये पूर्णज्ञानी निळ्या
परागी वसे त्याच तत्त्वात रंगू, न पद्माहुनी वेगळ्या पाकळ्या

- मंदार. 

Saturday, October 26, 2024

संध्याकाळच्या ओव्या


शुक्रास लाजून
पश्चिमा आरक्त
केवळ निमित्त
संध्याकाळ

अजून पूर्वेला
सूर्याचा आठव
मनात साठव
संध्याकाळ

केसांत गारवा
मनाचा पारवा
लाटांत मारवा
संध्याकाळ

सूर्याच्या तेजाळ
दानास जागते
चांदणे पेरते
संध्याकाळ

पाखरांची पुन्हा
थांबली कुजबूज
आठवांचे गूज
संध्याकाळ

आता हात सुटे
खोल काही तुटे
शेवटची भेटे
संध्याकाळ


- मंदार.

Wednesday, October 23, 2024

कृष्णार्पण


अपमान शांततेने साहतो कृष्ण आहे
अपराध शेकड्यांनी मोजतो कृष्ण आहे

मार्गात बांध घाला, टाका कितीक धोंडे
त्यातून पारदर्शी वाहतो कृष्ण आहे

टीका, प्रलोभने वा, शंका, खुशामतीही
गोंगाट ऐकुनी हा हासतो कृष्ण आहे

ईर्ष्या, अहं, असूया, मद, मोह, मत्सरादी
वैर्‍यांस आज सार्‍या मारतो कृष्ण आहे

हरवेल वाट आता, संपेल सर्व वाटे
हाकेस तोच माझ्या धावतो कृष्ण आहे

अपुल्याच माणसांनी विश्वासघात केला
हाती धनुष्य घ्याया सांगतो कृष्ण आहे

घनगर्द संकटांचे आभाळ दाटलेले
त्यांना कडा रुप्याच्या लावतो कृष्ण आहे

मुरलीत स्तब्धतेला, किरणांत वादळाला,
गीतेत संभ्रमाला बांधतो कृष्ण आहे

-- मंदार.

Monday, October 07, 2024

आहे पण, अन् नाही पण..!

जरा तुझ्याशी भांडायाचे आहे पण अन् नाही पण
जरा स्वत:शी जुळवायाचे आहे पण अन् नाही पण

कुणी ऐकतो मख्खपणे अन् कुणी चघळतो अफवाही  
मनातले सल सांगायाचे आहे पण अन् नाही पण

किती ऐकले पोक्त इशारे, टोले, सल्ले प्रेमाचे
फक्त स्वत:चे ऐकायाचे आहे पण अन् नाही पण

करायचे ते केले नाही दिवसा स्वप्ने बहुरंगी
मारुन-मुटकुन निभवायाचे आहे पण अन् नाही पण

जादूच्या ह्या मंचापुढती तर्काचे हे सोंग फुके
जरा-जरासे लपवायाचे आहे पण अन् नाही पण

भाळावरच्या रेषांबद्दल धन्यवाद अन् गार्‍हाणे
आपण अपुले रेखायाचे आहे पण अन् नाही पण

 - मंदार.

Sunday, August 11, 2024

संक्रमण


मी छाटल्या ठिकाणी उमलून आज आलो
ग्रीष्मातला बहावा होऊन आज आलो

चांभारचौकश्यांना चकवून आज आलो
कुप्रश्न धाडसाचे उठवून आज आलो

वेड्यांमुखी प्रशंसा वदवून आज आलो
हेटाळणीस त्यांच्या टाळून आज आलो

जे लागले जिव्हारी लपवून आज आलो
मौनात संयमाला सजवून आज आलो

चिंता - नव्हे - चितांना फसवून आज आलो
माया अशाश्वताची सोडून आज आलो

- मंदार.

Tuesday, March 07, 2023

तुला भावणारा ..

"कवितेचं पान" या मधुराणीताईने चालवलेल्या नितांत सुंदर चॅनेलवर एक आशयघन कविता ऐकायला मिळाली. रश्मी मर्डी या कवयित्रीने सुरेख लिहिलीये, आणि गायलीयेही फार अप्रतिम. नक्की ऐका - 

"तुला भावणारी" - रश्मी मर्डी (https://youtu.be/DVe2EKZS1nA?t=94)


तुला भावणारी अशी रोज नवखी कशी होत गेले मला ना कळे
किती यत्न केले तुला जिंकण्याचे तरी ना कसे रे तुला आकळे
तुझ्या जाणिवांना जपावे किती सांग मी रोज आतून कोमेजते
आता शांत मी ही हळू होत आहे जशी ज्योत हळुवार मंदावते

शिरस्त्याप्रमाणे जरी रोज येतो नि जातो तुझ्या आठवांचा थवा
अश्या कोवळ्या जीर्ण पाशात आता नको वाटते गुंतवावे जिवा
नव्याने सुखाचे जुने भास होता पुन्हा पापणी रोज पाणावते
आता शांत मी ही हळू होत आहे जशी ज्योत हळुवार मंदावते

खुज्या भाग्यरेषा अश्या आपुल्या रे कि स्वप्नातही सोबतीला न तू 
शिशीराप्रमाणे बहरलो असे का हरवले कुठे वेगळाले ऋतू
असे काय घडले कुठे शोध घेऊ मनाला नवे रोज समजावते 
आता शांत मी ही हळू होत आहे जशी ज्योत हळुवार मंदावते



ही आज अनंत वेळा ऐकली! आणि ऐकताना वाटलं की ’त्या’ची ही एक बाजू असेल ती लिहावी. त्यातून जे आलं ते ---  

तुला भावणारा जरी आज आहे तुला शोभणारा न अद्याप मी 
तुला हिरकणीला नसे कोंदणासारखा शिंपला मोतियाचा न मी
नव्याने स्वत:ला जगी घडवतो मी तुझ्या आठवांना उरी वाहतो
जरी शांत राहे तुझी आस आहे तुझे स्वप्न घेऊन मी चालतो 

खळाळे तुझे शुभ्र माधुर्य सरिते सखा सागरासारखा नाही मी
तुझ्या चांदण्याला न शरदास मेघांविना साजरे शांत आकाश मी 
तुझ्या मोकळया वारूला वेगवारा मनासारखा सोबती वाहतो  
जरी शांत राहे तुझी आस आहे तुझे स्वप्न घेऊन मी चालतो 

बटांच्या न पक्ष्यांस आधार आता जुन्या ओळखीचा नसे वृक्ष मी
तुला शांतवाया मला साधणारा नसे राउळी धीर गंधार मी
तुझे मूक अश्रू पहाटे दंवासारखे मी मुक्याने इथे झेलतो 
जरी शांत राहे तुझी आस आहे तुझे स्वप्न घेऊन मी चालतो 


- मंदार. 

Tuesday, November 02, 2021

रंग माझा वेगळा - सुरेश भट

रंगुनी रंगात सा-या रंग माझा वेगळा, 

गुंतुनी गुंत्यात सा-या पाय माझा मोकळा


सुरेश भटांचं आयुष्य वादळी होतं. मला वाटतं हे गीत त्यांनी बरंचसं स्वत:च्या अनुभवांवर लिहिलं आहे. 

आयुष्यातले उतार-चढाव बहुतेकांच्या नशिबी असतातच. पण सामान्यांच्या मानाने भटांच्या वाट्याला आलेले अनुभव अतिशय खडतर होते. पायाला पोलियो, शालेय जीवनातलं अपयश, त्यामुळे घरात आणि बाहेर दुय्यम वागणूक आणि उपेक्षा, आणि कालांतराने स्वत:ला काही अंशी सिद्ध करून देखील वाट्याला आलेली परकेपणाची भावना. 

ह्या सगळ्यातून भटांसारखा कलंदर माणूस उत्कटतेनं जगत राहतो. अडचणी-दु:ख हे सहन करत असतानाही ते एक आपला वेगळा ठसा उमटवतात, आपला असा एक विलक्षण परीघ निर्माण करतात, आणि तो उत्तरोत्तर वाढवत नेतात. हे गीत म्हणजे या प्रवासाची कहाणी आहे. 

रंगुनी रंगात सा-या रंग माझा वेगळा, 

गुंतुनी गुंत्यात सा-या पाय माझा मोकळा

वाट्याला आलेली सुखं-दु:खं भोगताना आपला एक वेगळा रंग-ढंग आकार घेत जातो. प्राक्तन कोणाला चुकत नाही, पण भटांसारखे कलंदर ह्या जगरहाटीत गुंतूनही निराळीच उंची गाठतात.


भोग जे येती कपाळी ते सुखाने भोगतो;

अन्‌ कळ्या झाल्या कधीच्या सोशिल्या ज्याच्या कळा !

ह्या सोसलेल्या कळांच्या कळ्या-फुलं करण्याचा कलंदरपणा भटांसारख्यांकडेच असतो. भोवताली कितीही विदारक परिस्थिती असेल तरी आपल्या आतल्या प्रेरणेने काही लोक त्या चिखलातही कमळं फुलवतात. (ह्याची पराकोटीची साक्ष देतात ज्ञानेश्वरांनी आपल्या पाठीवर भाजलेले मांडे, किंवा Victor Frankl सारख्यांचे नाझी छळछावणीतले अनुभव.)  आणि ह्यातून जात असताना फार थोड्या लोकांना भटांची खरी ओळख पटली आहे. एके ठिकाणी त्यांनी लिहिलंय, "जाणते ही बाग माझ्या सोसण्याच्या सार्थकाला, मी इथे हे अमृताचे रोपटे रूजवून गेलो..!"


राहती माझ्यासवे ही आसवे गीतांपरी

हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा !

दु:ख सुद्धा पूर्ण झोकून देऊन भोगता येतं. त्या वेळच्या अश्रूंची झालेली गाणी भटांची साथ करत राहतात. नेहेमी त्यांच्या ओठांवर येत राहतात. इथे पुन्हा पुन्हा वाट्याला येणारी काही एक प्रकारची दु:खं भट सांगतायत - जी त्यांच्या आसपास घोटाळत राहतात - जणू त्यांना भटांचा लळा लागलाय!  भटांचाच एक शेर आहे -  "प्राण जाताना दग्याचा मी कुठे आरोप केला ? ओळखीच्या माणसांचे ओळखीचे घाव होते.."  हे असे ओळखीचेच घाव पचवत भट पुढे जात राहतात.


कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो

अन्‌ कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा ?

अन्याय, अवहेलना, उपेक्षा सहन करत करत भट स्वत:ला सावरू बघतात. पण हे करत असताना बाकीच्यांच्या वाटेला येणारं साधं आयुष्य, त्यातल्या लहान पण सोनेरी क्षणांना ते पारखे राहून जातात. 


सांगती तात्पर्य माझे सारख्या खोट्या दिशा :

"चालणारा पांगळा अन्‌ पाहणारा आंधळा !"

ह्या प्रवासाच्या एका टप्प्यावर स्वत:ला नुसतं सावरूनच नाही, तर फुलवून भट प्रस्थापित होतात. एक उदाहरण म्हणजे बीएला दोनदा नापास झालेल्या सुरेश भटांचा ‘रंग माझा वेगळा’ हा काव्यसंग्रह एम.ए.साठी अभ्यासक्रमात क्रमिक पुस्तक म्हणून ठेवला जातो. पण हे होत असतानाही, स्वत:चे काही कर्तृत्व नसणा-यांनी (खोट्या मार्गदर्शकांनी) त्यांची उपेक्षाच केली. भटांच्या आयुष्याला एखाद-दोन विशेषणांत बंदिस्त करून त्यांच्या कामगिरीला छेद देण्याचा, कमी लेखण्याचा प्रयत्न झाला.. 


माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी :

माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा !


इथे शेवटच्या शेरात भट प्रखरपणाने प्रकट होतात. हा सगळा प्रवास हा फक्त सुरेश भट ह्या व्यक्तीच्या संघर्षाचा नसून, त्यांच्या कलंदर जगण्याने प्रेरित होणा-या अनेकांचा आहे. जेव्हा सगळीकडे अनीती पसरली आहे, दिलदारपणा संपला आहे, एकमेकांनी फक्त खाली ओढण्याचा खेळ चालला आहे, अश्या माणसांनी स्वत:च निर्माण केलेल्या मध्यरात्री, भटांसारखा एक कलंदर सूर्यासारखा हिंडतो आहे. आपल्या परिघातला अंधार निपटून टाकतो आहे. आपल्यासारखे उत्कट जगणारे कोणी शोधतो आहे. अश्या पेटून जगणा-यांबद्दल भटांनी लिहिलंय - "जरी या वर्तमानाला कळेना आमची भाषा, विजा घेऊन येणा-या पिढ्यांशी बोलतो आम्ही!"


भटसाहेबांसारखा गीतकार-गज़लकार पुन्हा होणं नाही.. त्यांच्या प्रतिभेला आणि जीवनदृष्टीला नकळत हात जोडले जातात! 

Friday, August 27, 2021

आहेस कुठे तू?


डाव अर्धा राहून गेला, आहेस कुठे तू?
चहा थंड होऊन गेला, आहेस कुठे तू?

काडी तुझी, विडी माझी पेटत होती
मस्कापाव वाळून गेला, आहेस कुठे तू?

गाडी माझी, पेट्रोल तू भरणार होतास
गोवा प्लॅन राहून गेला, आहेस कुठे तू?

तुझ्या शकील साहिरचा मी तलत रफ़ी
तप्त स्वर विरून गेला, आहेस कुठे तू?

भेगांमधून हिरवे कोंब फुटू पाहत होते
'अमलताश' गळून गेला, आहेस कुठे तू? 


- मंदार.

कातरवेळ


परवा म्हणालास सरतंय वय, तसा संथ होतो आहेस
.. समुद्राकडे निघालेल्या नदीसारखा संथ हो
परवा म्हणालास सरतंय वय, तसा आवाज कापतो आहे
.. कातरवेळी समईपुढला भावभरला कंठ हो

परवा म्हणालास सरतंय वय, डोळ्यांत चट्कन पाणी येतं
.. तापलेल्या जमिनीसाठी गर्द निळा मेघ हो
परवा म्हणालास सरतंय वय, तसं लक्षात राहात नाही
.. संध्याकाळी आभाळावर बगळ्यांची रेघ हो

परवा म्हणालास सरतंय वय, दिसत नाही नीटसं काही
.. धुक्यामध्ये हरवलेली टेकडीवरची वाट हो
परवा म्हणालास सरतंय वय, उगाच गळा दाटून येतो​
.. पाऊलखुणा कुरवाळणारी वाळूवरची लाट हो

परवा म्हणालास सरतंय वय, तसा इवला होतो जीव
.. सुरकुतलेल्या हातांमधली मऊशार वीण हो
परवा म्हणालास सरतंय वय, पडदा पडेल खेळावर
.. मनात वाजत राहणारी आठवांची बीन हो


- मंदार.

Saturday, August 07, 2021

दिवे लागले रे..

दिवे लागले रे .. पं. अभिषेकींनी संगीत दिलेली आणि गायलेली शंकरबाब रामाणींची ही रचना खूप खोलवर हलवून गेली..


दिवे लागले रे, दिवे लागले रे, तमाच्या तळाशी दिवे लागले रे 
दिठीच्या दिशा खोल तेजाळताना, कुणी जागले रे कुणी जागले ..

रित्या ओंजळी दाटली पुष्पवृष्टी, असे झाड पैलाड पान्हावले 
जिथे मोकळा मी मला हुंगिताना, उरी गंध कल्लोळुनी फाकले 

उभ्या रोम-रोमातुनी चैत्रवाटा, कुणी देहयात्रेत या गुंतले..!
आरक्त त्याच्या कृपेच्या कडा अन् उष:सूक्त ओठात ओथंबले

शंकर रामाणींनी त्यांची पत्नी मृत्युशय्येवर असताना ह्या ओळी लिहिल्या आहेत. तिच्या आयुष्याची अखेर समोर उभी असताना एका विलक्षण, विचित्र मानसिक अवस्थेत शंकर बाब सापडले, आणि त्यातून हे गीत बाहेर पडलं. 

बहुतेक काव्यामध्ये ’दिवे लागणे, तेजाळणे’ हे शुभ, आनंददायक प्रतीक म्हणून वापरलं जातं. पण हे गीत त्या अर्थाने साधं-सरळ इहलोकातलं आनंदगान नाही. आयुष्याच्या संध्याकाळी, परलोकाच्या उंबरठ्यावर उभ्या असणार्‍या एका योग्याचं मनोगत आहे हे. किंबहुना विचारी माणूस मृत्यू समोर असला की असा योग्याच्या भूमिकेत जातो, आणि अनेक गहन विचार त्याच्या मनात उचंबळून येतात. एका बाजूला, इहलोक आणि इथलं सगळं प्रिय ते सोडण्याची वेळ जवळ आलेली असते, आणि दुस-या बाजूला व्यक्तीचा आत्मा शरीराचा हा पिंजरा सोडायला उत्सुक असतो. त्या आत्म्याच्या दृष्टीने मृत्यू हा सरळसरळ दु:खदायक प्रसंग नसून, जगण्याच्या पुढचं नैसर्गिक पाऊल आहे. देशाटन करणा-या प्रवाश्याने जसा सहजपणे एका प्रदेशाचा निरोप घेऊन नदीपार दुस-या प्रदेशाकडे नावेतून जावं, तसं ह्या आत्म्याचं आहे ते शरीर गळून पडणार आहे, आणि तो पुढच्या प्रवासाला जायला मोकळा आहे. ग्रीक पुराणांमधली ’Styx' नदी ही अशीच इहलोक आणि परलोकाच्या सीमेवरची नदी आहे. 

दिवे लागले रे, दिवे लागले रे, तमाच्या तळाशी दिवे लागले 
दिठीच्या दिशा खोल तेजाळताना, कुणी जागले रे, कुणी जागले..

रामाणींनी ’तमाच्या तळाशी दिवे लागले’ असं म्हटलंय. इहलोक सोडण्याच्या क्षणी, मृत्यू समोर असताना, अंधाराने भरून गेलेल्या आयुष्यातला शेवटचा किरण त्या मुक्तीच्या दिव्याचा आहे. हा दिवा त्या अंधाराचा समूळ नाश करणारा आहे - त्यामुळेच तो खोल तळाशी आहे. मनुष्याचे आतले डोळे आता त्या दिव्याकडेच लागले आहेत, आणि एक निराळीच जाग आली आहे. ही जाग आत्म्याच्या पातळीवरची आहे, ज्याची पुसटशी ओळख आता होऊ लागली आहे. कुणी जागले रे .. 

रित्या ओंजळी दाटली पुष्पवृष्टी, असे झाड पैलाड पान्हावले 
जिथे मोकळा मी मला हुंगिताना, उरी गंध कल्लोळुनी फाकले 

मृत्यूच्या समीप, ह्या विचारी माणसाने इहलोकातलं सगळं अर्पण करून टाकलं आहे, त्यागलं आहे. हे मृत्युकाळी येणारं वैराग्य सांगणा-या संत तुकारामांच्या ओळी आहेत - "वैराग्याच्या शेणी लागल्या शरीरा, ज्ञानाग्नि लागला ब्रह्मत्वेसी". आता मानवाची ओंजळ परलोकातलं दान स्वीकारण्यासाठी मोकळी आहे. आणि पैलतीरावरचं ते झाड ह्या ओंजळीत फुलांचा वर्षाव करणार आहे.   हा एक उंबरठा ओलांडून गेल्यावर आलेलं हलकेपण रामाणींनी गंधभाषेतून सांगितलंय. आपल्या पाच जाणिवांमध्ये वासाची, गंधाची जाणीव ही सर्वात जास्त तरल, पण दीर्घकाळ सोबत करणारी आहे. त्याचा दाखला देऊन रामाणी सुचवतायत की जणू आत्मा आता स्वत:ला परत ओळखू लागलाय, आणि आपलीच खूण पटल्याचा एक निराळाच आनंद-कल्लोळ दाटलाय.. 

उभ्या रोम-रोमातुनी चैत्रवाटा; कुणी देहयात्रेत या गुंतले..!
आरक्त त्याच्या कृपेच्या कडा अन् उष:सूक्त ओठात ओथंबले

शरीर सोडून आत्मा पुढच्या प्रवासाला निघाला.. आता पैलतीरावरची हाक ऐकू येतेय. एक नवी रोमांचक सुरुवात, चैत्र महिन्याची आठवण करून देणारी. आता जो देहयात्रेत गुंतला होता तो शारीरभाव मागे पडला, अनोळखी वाटायला लागला. परत तुकोबांची ओवी आठवते - "तुका म्हणे रक्षा जाली आपोआप । उजळला दीप गुरूकृपा"! आता दृष्टी पुढे स्थिर झाली - सूर्योदयाच्या अगदी सुरुवातीला लालिमा पसरतो तश्या कृपेने आश्वस्त होऊन ह्या नव्या पहाटेचं गीत दाटून आलं. 


शंकर रामाणींच्या ह्या गहनगंभीर रचनेला पं. अभिषेकींनी साजेसं संगीत दिलंय आणि त्यांच्याच आवाजाने अमर केलंय. गोव्याच्या ह्या दोन महान कलाकारांनी दिलेलं परलोकीचं देणंच. 

- मंदार.

Wednesday, October 10, 2018

कवडसे

स्तब्ध आकाशी उषेने
मुक्त यावे
पाखरांनी
​पानजाळीतून गावे  

सागराने श्रावणाचा 
मेघ व्हावे
अंतरीचे 
चिंब ओले दान द्यावे

पावसाने काळजाशी 
ऊन घ्यावे 
या नभाला
सप्तरंगी स्वप्न द्यावे

या​ नभाने चांदण्यांची
शाल ल्यावी​
​मोजताना​
या​ भुईला नीज यावी​


- मंदार.

Sunday, September 16, 2018

भंगार..!

​​अरे
 भंगार भंगार, नवे 
मिळे जुन्यावर
आधी
 तराजू लटके, चार
 
दमड्या 
हातावर 

अरे भंगार भंगार, वाया कधी म्हणू नये
मारकुट्या
 नव-याला, ’राया’ कधी म्हणू नये

अरे भंगार भंगार, 
मोह-
माया म्हणू नये
मावळतीच्या देण्याला, 
कधी ​
या
 म्हणू नये 

अरे भंगार भंगार, उरलं-सुरलं
 मायाजाल
मन​ भरलं भोगून, पाणी सोडावं खुशाल​

अरे भंगार भंगार, होई​ मोहाचा निरास​
देणा-याच्या​ हातांनाही, ​येई फुलांचा सुवास


- मंदार

Friday, January 08, 2016

प्रतिबिंब

असा गंंध वा-यावरी स्वार होता
तिच्या कुंतलांनी फुलारून जावे
असा बासरीचा निळा सूर येता
तिच्या रोमरोमात गाणे भिनावे

असे पान-पानात वैशाखसोने
बहाव्यापरी ती झळाळून यावी
असा श्रावणाचा धरास्पर्श होता
शहारून संकोचिनी ती मिटावी

असा मी रसासक्त रंगून जाता
तिने खोल माझ्यात हरवून जावे
पहाटे पहाटे तिला नीज येता
पुन्हा स्वप्नमार्गे मला बोलवावे 



- मंदार.

Thursday, January 07, 2016

यिन - यांग

मागण्यात काही चूक नाही, मागण्यात पाप नाही. 
पाप आहे ते लाचारीत, खोटेपणात, आणि कृतघ्नतेत. 


"ऊं! हे कशाला?" असं विचारण्याच्या ओघात माझ्यासारख्या नास्तिकानं विचारलं होतं - "कशाला जायचं जोगवा मागायला?" 

"ठीक आहे. जोगव्याचं समर्थन नाही करणार मी. आणि तसंही कसलेसे धार्मिक संकेत आणि रूढी-परंपरा ठेवूया बाजूला. पण असंही बघ. आपण मागण्याबाबत बोलू."

"बरं."

"अरे, मानानं जगणारी, टुकीनं संसार करणारी माणसं आपण. पण वेळ आली तर नि:संकोच, प्रसंगानुरूप, लाचार न होता पण परिस्थितीची जाणीव ठेवून आपल्याला समाजाकडून काही मागता आलं पाहिजे. आपल्याच धुंदीत नेहेमीच असणारे, दारावर आलेल्या भिक्षुकाला कधीच रिकाम्या हाती जाऊ न देण्याची प्रौढी मनात का होईना मिरवणारे आपण, कधीतरी कोणाच्या दारात उभं राहून काही मागून तर पाहूया. 

स्वत:साठी नको मागूस फार तर. विनोबांनी नाही भूदान मागितलं? विनोबांचं सोड. आपण नाही रे तितके मोठे. पण अहंता बाजूला ठेवून काहीतरी मागणं जमेल आपल्याला? जितक्या सहज, (आणि स्वत:ला शाबासकी देत) आपण दुस-यांच्या डोक्यावर ऋणाची बोचकी ठेवत-ठेवत जातो, तितक्याच साधेपणानं दुस-यांचं काही ऋण आपल्याही माथ्यावर घेणं जमेल? देवीच्या नावाने माग किंवा देशाच्या नावाने, दोन मुठी धान्य माग किंवा हजारो बिघे जमीन. मागून तर पहा. स्वत:पलीकडे जाण्याची, एकतर्फी ऋणाच्या कल्पनेतून मुक्त होण्याची संधी आहे ती.

मागण्याला जर कमीपणाचं समजत असशील तरी प्रसंगानुरूप वाकण्यात, एक पाऊल मागे जाण्यात कमीपणा नाही. शहाणपणा आहे. अन्यथा कोणासमोरही न वाकणा-या सम्राटालाही नतमस्तक व्हायला एखाद्या भिक्षुकाचे पाय हवेत. आणि तशी संस्कृती असणं हे बहुतांशी शहाणपणाचं आहे. सगळ्यांना नाही रे पुरत अंत:स्थ जाणीव नम्रता टिकवायला. मातीचे का होईना, बाहेरचे पाय हवे असतात डोकं टेकवायला. आत बघण्याची वाट ही अशीही जाऊ शकते.

ताठ मानेनं जगण्याची कल्पना धरून असताना, आपल्याला वाकताही यायला हवं. जसं देता यायला हवं तसं मागताही यायला हवं. त्या मागण्यात लाचारी नसावी; देणा-याला घातलेली सच्ची हाक असावी. 

डोळे उघड आणि निसर्गाकडे पाहा. अनेक कडेकपारी, गुहागरुड, द-याखोरी, झाडंपाडं, नदीनाले अंगावर खेळवणारा पर्वत बघ.  आणि नेमाने त्याच्या माथ्यावर बरसणारं आकाश. माझ्या दृष्टीनं दोघंही मोठे. पण बघ तो महाकाय पर्वत किती शांतपणानं, सचैल भिजून घेतोय पावसात. आकाशीचं देणं स्वीकारण्यातलं देखणंपण ह्याच्याकडून शिकावं! डोळे मिटून दाट अरण्यात ध्यानस्थ बसलेला ऋषीच जणू. वीजवारं-पाऊसपाण्याची संततधार आधी आपल्या माथ्यावर घेऊन आपल्या लेकरांना हलकेच न्हाऊमाखू घालणारा बाप. 

त्या डोंगरासारखंच, आकाशातलं ऋण झेलता यायला हवं.. इतकं की आपलं घेणं देखणं होऊन जावं. 



- मंदार.

Wednesday, February 19, 2014

मी जाता..

"मी नसले, तर कोणाचं किती अडेल..?

म्हणजे, कामावर आहोत आम्ही ८ जण,
तर तिथे एक-अष्टमांश अडेल.

आपल्या दोन्ही घरांत मिळून एक-दशांश अडेल,
मित्रमंडळीत एक-पंचवीसांश,
नातेवाईकांच्या गोतावळ्यात एक-शतांश अडेल.

म्युन्सिपाल्टीच्या निवडणुकीत एक-दशसहस्रांश..?
आणि ह्या येवढ्या मोठ्या देशा-दुनियेत
शंभरावर कोटीत एक भाग अडेल माझ्याशिवाय."

"तू नसशील, तर माझं सोळा आणे अडेल." 

Thursday, December 05, 2013

प्रतीक्षार्थ

मावळत्या शुक्रामागुन    
मधुरात्र लाजरी येईल
किरणांना खेळायाला 
दंवबिंदू देऊन जाईल

चांदवा - प्रियाचा भास!
बरसेल सखीची प्रीत
हेव्याने धरणी लाविल
चंद्राला काजळतीट

वाळूवर लपलप लाटा
सा-याच खुणा पुसतील
उमटेल पुन्हा आशेने
कधि पाउल संयमशील?

थकलेली पिवळी पाने
गळतील तळ्याच्या काठी
आरक्त-धवल शोकाकुल
प्राजक्त मूक सांगाती

तुज अलगद आठवताना
मन गवतफुलांचे होईल
हुरहूर - मधाचा ठेवा!
त्या फूलपाखरा देईल

"तू अशीच येशिल, येशिल"
गुणगुणता मिटेन डोळे
मम स्वप्न-स्वर्ग-अनुगामी
सोपान दंवाने ओले..


- मंदार.

Sunday, December 01, 2013

कुणी बुद्धी घेता का बुद्धी?

कुणी बुद्धी घेता का बुद्धी?

घ्या ना थोडीतरी, ताई!

मूठभर तुम्हाला देऊ, दादा?

अति झालेल्या अकलेला

गि-हाईक शोधतोय मी.
खूप महागात पडतीये मला..
पडता भाव घेऊन खपवतोय झालं.

आमचे येथे बुद्धी विकणे आहे!

बक्कळ अक्कल, मार्मिक मती,
कवीची कल्पना, अल्पशी प्रज्ञा,
झालंच तर -
तिखट तर्क, वैज्ञानिक जाण,
माणुसकीचं तत्त्वज्ञान,
सगळा माल अहंकार-भेसळमुक्त मिळेल.
(असं नुस्तं लिहायचं असतं, हेही शिकलोय नुकताच!)

अक्कल बाजूला ठेवल्याशिवाय

साधं रोजचं जगता येत नाहीये!

शाळेच्या वर्गात रोज घोकतो ती प्रतिज्ञा

बाहेर आल्यावर सहज विसरता येत नाहीये,
मूल्यशिक्षणाच्या तासाला कानावर पडलेलं
शाळेबाहेरच्या कचराकुंडीत फेकता येत नाहीये,
कॉलेजमधला लोकप्रिय खेळ -
"आधी शिक्षक (चांगलं शिकवणार), 
का आधी विद्यार्थी (नियमित हजेरी लावणार)"
उगाचच माझं डोकं फिरवतोय!

देवळाच्या पायरीवर बसलेल्या भिका-यांकडे दुर्लक्ष करता येत नाहीये,

(जर "देतो, तो देव" असेल, तर ते आत जाऊन
काही मागण्या ऐवजी तुम्हा-आम्हा माणसांना का मागताहेत?)
आडनाव विचारल्याशिवाय देवाची सेवाही करू देत नाहीत, हे
"आपलं तर दर्शन झालं ना घेऊन" असं म्हणून सोडून देता येत नाहीये,
सोन्यानं मढलेल्या सुरेख मूर्ती पाहून
रोज अर्धपोटी झोपणा-या करोडोंना विसरता येत नाहीये,
घरातला कचरा काढून उंब-याबाहेर फेकता येत नाहीये,
आज आपल्याला देवालयांपेक्षा शौचालयांची गरज आहे
हे कोणी म्हणलं तर त्याची टर उडवता येत नाहीये..

जी बुद्धी वापरून विज्ञान शिकलो, इंजिनीयर झालो,

ती बुद्धी फक्त इंजिनियरिंगच्या कामात
आणि पैसे कमवायलाच वापरायची;
पण ते पैसे कसे, कशासाठी वापरायचे
हे ठरवताना मात्र गहाण टाकायची - जमत नाहीये!

रोजच्या बातम्या ऐकवत नाहीयेत,

त्याच त्याच नेत्यांना निवडून देता येत नाहीये,
"अहो, भ्रष्टाचार असायचाच, आपलं ठीक चाललंय ना?"
असं चहाकटिंग मारता मारता म्हणता येत नाहीये,
इतकं काय, "हर फ़िक्र को धुएं में उड़ाना" पण जमत नाहीये!

खरं तर हे इतकं सरळ आहे -

माझं डोकं हे बुद्धी वापरण्यासाठी नाहीच,
नंदीबैलासारखं सगळ्या रूढी-परंपरा-पद्धतींना
"हो, हो" म्हणण्यासाठी आहे!
(आणि हो - पैसे कमवण्यासाठी. त्याचं सोंग नाही आणता येत!)

त्या बुद्धीने कठीण, गहन प्रश्न विचारायचेच नाहीत,

लोक सांगत आले ते ऐकत जायचं, तसंच करत जायचं,
आपल्याला पटो, न पटो... - हे जमतच नाहीये!
.. तुम्ही घेऊन टाकलीत तर नक्की जमेल!

कुणी बुद्धी घेता का बुद्धी?


- मंदार.