एखाद्या धगधगत्या ज्वालेनं आपलं तेज लक्ष लक्ष ज्योतींना द्यावं,
तेजाळ सूर्यानं धरतीवरची काळरात्र एका क्षणात निखंदून टाकावी,
तसंच ..
गरुडानं चिमण्या-कावळ्यांना, राघू-मैनांना उत्तुंग भरारीसाठी पंख द्यावेत,
आणि एखाद्या वटवृक्षानं त्यांच्या तप्त आत्म्यांना मायेची सावली द्यावी,
तसंच ..
एखाद्या मातेनं आपल्या रक्ताचं स्तन्यामृत पेशीपेशींना पाजावं,
एखाद्या पित्यानं अजाण असहाय अडखळणा-या पावलांना वाट दाखवावी,
तसंच ..
बाबा, तसंच, तुम्ही केलंत - दिलंत - दाखवलंत !
"ज्वाला उफाळत जश्या वर जावयाते,
ध्येये तशीच अमुची असू देत माते!"
अश्या तुमच्या ध्येयांना म्हणतोय आमचं.
तुम्ही आणलेल्या वादळातलं मूठभर आमच्याही छातीत घेतोय साठवून.
तुमच्या हातातल्या मशालीवर लावतोय आमचीही एक पणती.
अश्या ध्येयांची स्वप्नं पेलवतील ना आम्हाला?
अश्या वादळात अभंग राहील ना आमची छाती?
आणि हातातली ती पणती सांभाळू शकू ना आम्ही?
... अश्या सगळ्या शंका-कुशंका-अविश्वासाला तिलांजली देतोय आज.
तुम्हीच एकदा लिहिलं होतं -
"जहाजाबरोबर स्वत:ला बुडवून घेणारे कर्णधार जेथे असतात,
तेथेच बुडता देश वाचवणा-या नाविकांच्या पिढ्या जन्म घेतात!"
बाबा,
अज्ञाताच्या दिशेनं जाताना भेटतील तुम्हाला किनारे, आणि लाटांचे कल्लोळही.
आमची वाट पाहणा-या किना-यांना,
आणि लाटांच्या त्या उग्र कल्लोळांना इतकंच सांगाल?
.. आम्ही अजून जहाज सोडलेलं नाही!
Subscribe to:
Post Comments (Atom)
4 comments:
वा क्या बात है
मी माझ्या मुलास विचार करायला शिकवलय
Khadyotsooryagaan
(mhanje tu khadyot ahes ase nahi : Baba Soorya)
Surekh!
फारच छान :)
-मधुरा
Post a Comment