Wednesday, December 22, 2010

संध्याछाया

दीस गढूळला आता त्यात हरवलं रान
काळ्या चुन्यात रंगून काजळलं पान पान

हरवलाय तो पार, ती तापलेली दुपार अन् पानाच्या डब्यांतली कात-चुन्याची कुजबूज. सुरकुतलेल्या सुपा-या परतल्यात आपापल्या चंचीत. आता वाट बघायची दोन आगींची - एक भाकरी देऊन पोट भरणार, दुसरी गप्पा रंगवून मनभर होणार. तिसरी? - ती ओघळून गेलीये शेजेवरून कधीच.


दीस सावळा कुंभार आला घरास दमून
पांढुरकी बाराबंदी दिली हळू उतरून

हातावरची माती झालीये आता कोरडीठण्ण. तळहात दिसतोय उन्हाळ्यातल्या भेगाळ जमिनीसारखा. अंग अन् अंगावरचं कापड दोन्ही सैल झालेत वा-यानं. बघ उडलं, उडलं.. उडून गेलं!


दीस तंबू एकखांबी एक त्याचा मक्तेदार
आता हजार चांदण्या घुमटाला तोलणार

सोन्याचा भलामोठा हंडा फुटून मोहरा झाल्यात अंगणभर. कोणी वेडा बसेल आता त्या वेचीत. तशीही आठवणींच्या पारंब्यांना लटकत भुतासारखी रात्र काढायची खोड आहेच त्याला.


दीस बाहेर उन्हात एक थकला जीवक
मनडोहात काळोख्या आता शोधतो दीपक

भगभगीत प्रकाशात जे दिसलं नाही, ते अंधार दाखवू शकेल? हो, कदाचित; जिथं हरवलंय तिथं शोधलं तर. नाहीतर दिवास्वप्न आहेच, उद्या संध्याकाळचं.



मंदार.

Saturday, November 06, 2010

कृष्णछाया

दीस मावळला आता त्यात हरवली वाट
शोधे देवकीचा देव कान्ह्यासाठी एक घाट

दीस निवळला आता त्यात हरवली जाग
राख गोकुळाच्या मनी, आग उद्धवाचा राग

दीस झाकोळला आता त्यात हरवली राधा
सावळ्याच्या आठवांची वेडीखुळी भूतबाधा

दीस गढूळला आता त्यात हरवले रान
श्याम कात-चुन्याविना मीरा काजळले पान

दीस आकळला आता त्यात हरवली आस
होतो अर्जुनाच्या मनी कर्तेपणाचा निरास


मंदार.

Saturday, July 24, 2010

मावसबोलीतल्या कविता

मोठी मुलं-मुली त्यांना कधी लहर आली की उगाच लिंबूटिंबूंनाही खेळायला घेतात, तसा मला आज सईकडून "मावसबोलीतल्या कवितां"चा खो मिळाला, तेव्हा डोक्यात "जिहाल-ए-मिस्कीं" ही अमिर खुस्रोंची दोन भाषांतली रचना आली. लहानपणापासून भरभक्कम संख्येने लाभलेल्या नातेवाईकांत राहिलो असल्यामुळे असेल कदाचित - एक सोडून दोन मावसबोल्या असलेली ही कविता निवडलीये. पर्शियन आणि ब्रज अश्या दोन भाषांत एक-आड-एक ओळी असलेली अप्रतिम रचना आहे ही. (पुढे पर्शियन, अरबी, तुर्की, हिंदी - अश्याच मिश्रणातून उर्दू जन्माला आली.)

ही रचना मी पहिल्यांदा गुलाम अलींच्या आवाजात इथे ऐकली होती. माझ्या नाहीत पण निदान माझ्या खापर-खापर-खापर-..-खापर पणजी-पणजोबांच्या तरी मावसबोल्या असू शकतील अश्या ह्या दोन भाषांमधलं काव्य पेलायला घेतलंय - चू. भू. द्या. घ्या.

'अनुवाद' करताना माहितीजालावर एक-दोन ठिकाणी मिळालेला इंग्रजी अनुवाद आधाराला धरलाय. पण (त्यांनी समाधान न झाल्यामुळे) उनाड मुलं पावसात आईबरोबर रस्त्यावरुन चालताना जेवढं तिचं बोट धरतात तेवढाच.


मूळ रचना:

Zehal-e miskin makun taghaful, duraye naina banaye batiyan,
ki taab-e hijran nadaram ay jaan, na leho kaahe lagaye chhatiyan.

Shaban-e hijran daraz chun zulf wa roz-e waslat cho umr kotah,
Sakhi piya ko jo main na dekhun to kaise kaatun andheri ratiyan.

Yakayak az dil do chashm-e jadoo basad farebam baburd taskin,
Kise pari hai jo jaa sunaave piyare pi ko hamaari batiyan.

Choo sham-e-sozan, choo zarra hairan, ze muhre-aan mahgushtam aakhir,
Na neend naina na ang chaina na aap aaven na bhejen patiyan.

Bahaqq-e roz-e wisal-e dilbar ki daad mara ghareeb Khusrau,
Sapet man ke waraaye raakhun jo jaaye paaon piya ke khatiyan.

- Amir Khusro.


अनुवादाचा प्रयत्न:

"का दृष्टि वळविसी दूर, विरहि मी चूर-चूर तुझिया रे,
हा श्चास तुटत चालला, उराशी मला धरी सदया रे,
बोलुनी भुलविणे किती! रात्र सवतीसवेच सरली रे!
मम धीर सुटत चालला, आपुली मला करी सखया रे!


हे लांब कुरल तव केश जसा विश्लेष दीर्घ रात्रीचा,
भासते आयु अत्यल्प जसा दिन स्वल्प तुझ्या भेटीचा,
रात्र न ही कंठवी दिसे मुखरवी न तो सखयाचा,
सखी! मार्ग तो सांग! जाळि सर्वांग अग्नि विरहाचा.


नेत्रांनी दावुन कळा लावुनी लळा जिंकिले होते,
जाणिले सखे सहजीच, मी न माझीच राहिले होते,
हे ऐकुन नि:श्वसतात, सख्या श्रवतात विरहिणी-गीते -
पण विरहाची ही कथा कुणितरी कथा जाउनी त्यांते!


ज्योत माझि थरथरे भरे कापरे भान ना राही,
तव प्रेमाग्नीचा संग रक्त रतिरंग अंगि रे वाही,
निद्रेला झाले वंचित तरिही किंचित आशा राही -
पाहीन तुझे पाऊलच किंवा चाहुल लागो काही!"


परि एकच निश्चय मनी करे मानिनी 'अमिर' सांगती,
"पाहते सख्याची वाट असो घनदाट तमाची भीती,
मोहते जरी मज वाट जात जी थेट सख्याच्या पुढती,
आदरिते मीलनदिन तो, शील न ब्रजबाला सोडती."


- मंदार.


आता माझा 'खो' प्रिया ला!

Wednesday, July 21, 2010

समुद्र.

फार प्रेमळ आहे ती.
हक्कानं जिच्याकडून लाड करून घ्यावेत अशी.
खट्टी-मीठी.
दिवसभर तोंडात धरली
तरी हव्याश्या वाटणा-या चिंचेसारखी लाघवी.
उगाच नुसत्या मिट्ट गोड साखरेसारखी नाही.

तिच्या नात्यांकडे पाहिलं तर
पोटातली माया समजते हळू-हळू.

कुरळे अल्लड केस एकत्र घेऊन
एक सुरेख वेणी घालावी, तशी
एकमेकांत गुंफलीयेत तिची सगळी नाती.
आहेत मोजकीच, पण अगदी घट्ट.
एकाच डोंगरातून उड्या मारत येणारे झरे
एकत्र येऊन नदी साजरी करतात तसंच.


तो?
वेडाय फक्त.
मनास आल्याशिवाय काहीच नाही करणार कधीच.
आणि तसं वागण्याचे जे काही भोग असतील
ते आनंदात भोगणार.
पश्चात्ताप वगैरे गोष्टींना मनात जागाच नाही.
सारख्या काही ना काही केलेल्या धडपडींचं बक्षीस
म्हणून खरचटणं ठरलेलंच.
ते उगाच लपवणार नाही
आणि दाखवत फिरणारही नाही.
मनात जपून मात्र ठेवणार!

त्याची सगळी नाती म्हणजे मनसोक्त भटकणा-या,
कधी मनात आलं तरच एकमेकींना चेहरा दाखवणा-या
डोंगरातल्या चुकार पायवाटा.
वैरिणी नसतील, पण सोय-याही नाहीत.
एकाच मनगटातून निघणारी
पण बाकी काहीच साम्य नसलेली पाच बोटं.


एकदा ते दोघं भेटले.
आणि मग भेटतच राहिले.

पुढे कधीतरी त्याची नातीही भेटली एकमेकांना,
तेव्हा त्याच्या लक्षात आलं -
समुद्राशी भेट जवळ आल्यावर
नदीला फाटे फुटतात
तेवढीच काय ती लांब होती एकमेकांपासून.
आणि त्याच्याच आतून आलेली ती सगळी,
एकदा समुद्रात मिसळून गेल्यावर
वेगळी का करता येणार होती?

नाती त्याची होती,
समुद्र तिचा.


- मंदार.

Tuesday, June 29, 2010

युग्म

दोन ओठांतून येती
कधी वेगळे का शब्द?

दोन कानांत घुमती
कधी वेगळे का सूर?

दोन डोळे पाहती का
कधी वेगळीच स्वप्नं?

दोन पावलांची होते
कधी वेगळी का वाट?


- मंदार.

Wednesday, February 17, 2010

विद्यापती ठाकूर - दोन कविता

चौदाव्या शतकातल्या 'विद्यापती' नावाच्या कवींची एक कविता कालच Poetry Chaikhana नं पदरात घातली. ती अशी:

As the mirror to my hand,
the flowers to my hair,
kohl to my eyes,
tambul to my mouth,
musk to my breast,
necklace to my throat,
ecstasy to my flesh,
heart to my home --

as wing to bird,
water to fish,
life to the living --
so you to me.
But tell me,
Madhava, beloved,
who are you?
Who are you really?

Vidyapati says, they are one another.



आज गायत्रीची ही ताजी नोंद वाचली, त्यात तिने विद्यापतींच्या ह्या दुस-या एका कवितेचं सुरेख मराठी रूपांतर केलंय -

He promised he'd return tomorrow.
And I wrote everywhere on my floor:
"Tomorrow."

The morning broke, when they all asked:
Now tell us, when will your "Tomorrow" come?
Tomorrow, Tomorrow, where are you?
I cried and cried, but my Tomorrow never returned!

Vidyapati says: O listen, dear!
Your Tomorrow became a today
with other women.



ह्या कवितेचं हिंदीत रूपांतर करण्याचा माझा प्रयत्न:


कल लौटने का दे वचन चल जो दिये मोरे पिया,
रंग 'कल' के नाम का घर-द्वार को मैंने दिया ।

पूछता है पौ के फटते ही मुझे ये गांव सारा,
"श्यामला री, अब बता दे आयेगा कब 'कल' तोरा?"

मोरे 'कल', सबकुछ मोरे, अब किस डगर ढूंढूं तोहे?
रो-रो के ये मन भोर को ही रात की छाया में है ।

"छोड, प्यारी, स्वप्न टूटा" कहत हैं विद्यापति,
"तोरा 'कल' तो हो चुका है आज सौतन-संगति"।


- मंदार.

Saturday, February 13, 2010

ओंडके



जा, तू जा सखी माघारी.
नको आज गळामिठी, नकोच आज गाठभेट.
उद्या, परवा, तेरवाही नकोच.
जाऊ दे थोडे दिवस, सरू दे थोडे महिने.
वेडाबाई, रोजच तर भेटतेस!
.. निदान तुझी आठवण तरी येऊ देशील का नाही?

नकोच. रोज नको दिसू तशी,
रोज नको सापडू अशी.
चंद्र-सूर्य संध्याकाळ, शब्द-सूर रानफुलं -
कशातच शोधलं नाही तुला, किती दिवसात.

गर्दीत मिसळून जाऊ दोघं.
भरकटू दूर, दूर तिरपांगड्या दिशा निवडून.
थोडी जा दृष्टीआड, थोडी हाकेच्या पलीकडे.

जरा बघू एकटंच चालून. पाहू वेगात धावून.
खाऊ चार धक्के एकटेच, देऊही दोन लावून.
ठरवून हरवून जाऊ, असं म्हण फार तर.

डोंगरद-यात हिंडताना
रानफुलांचा चुकार वास छाती भरभरून घेताना,
रात्री उघड्यावर पहुडल्यावर
चांदण्याचा स्पर्श होताना,
झ-याच्या अलिप्त खळखळीबरोबर
सुरेल तान छेडताना
जेव्हा तू कडकडून आठवशील,
जेव्हा तुझा गंध-सूर-स्पर्श यांनी
आणि यांनीच
माझा जीवताप शमेलसा वाटेल
तेव्हा निघेन परत यायला.

आणि तूही गेली असशील
सातासमुद्रापार निघून,
उडवला असशील घोडा चौफेर,
घातले असशील मातीत हात
आणि फुलवले असशील मोती.
दाणेदार अक्षरात गोंदले असशील
तुझे हळुवार चांदणबोल.
जेव्हा - आणि जर! -
तुला त्या मातीत
माझा रापलेला चेहरा पुन्हा दिसेल,
त्या शब्दांत माझा सूर ऐकू येईल,
आणि माझी कडकडून आठवण होईल,
तेव्हा - आणि तरच -
नीघ परत यायला.

पण परतीची वाट
जरा भरभर चालशील ना?


- मंदार.

Sunday, January 24, 2010

खूळ

एक सोनेरी सकाळ
दोन मनी उमलते,
तीन पायांची शर्यत
चार पायांना सुचते.


- मंदार.

Friday, January 22, 2010

तीन बीन

जो अंगूर मिले वो तो खट्टे थे
जो ना मिल पाये वो शायद मीठे

क्या इसे ही कहते हैं खट्टी मीठी ज़िंदगी?

****

उसी बेला के फूल तुमने भी चुने और मैंने भी
वही सुनहरे सपने तुमने भी बुने और मैंने भी

मैंने वो फूल, तुमने वो सपने, आज बेच डाले हैं

****

चली जाओ सखि लौटकर आज - गले मत लगो, बात मत करो,
कल भी न आओ, परसों भी नही; जाने दो कुछ समय ऐसे ही

पगली.. इतनी मिलोगी, तो तुम्हें याद करना भूल जाएंगे हम!


- मंदार.



Saturday, January 16, 2010

आर्तव

गं,

आज निवांत बसलोय अंगणात. तू करायचीस तसा वाफाळता दुधाचा चहा घेऊन. तुझ्या लाडक्या - आपल्या लाडक्या - मातीच्या लेकरांकडे बघत.

किती वेडीयेत ती! दर वर्षी हाच खेळ खेळायचा.. उन्हाळा सरला की असंख्य रंगांत पानं रंगवून आरास मांडायची. ती पाहून आम्ही ठार वेडे होणार. मातीबाईंच्या शाळेत रोज एकसारखा हिरवा गणवेश घालून जाणारी ही पोरं शरदाच्या त्या स्नेहसंमेलनात ओळखूही येत नाहीत. आपल्याच गल्लीतल्या ह्या नेहमीच्या दोस्तांचे चेहरे अवेळीच आलेल्या रंगपंचमीला किती निराळेच दिसतात! असं मनसोक्त खेळून झालं आणि हिवाळा जवळ आला की मग अल्लद ते रंग काढून ठेवायचे.. हुडहुडी भरायला लागली, की पानांची अंगडी-टोपडी आईकडे सोपवायची आणि थंडी उघड्या अंगानं, बोडक्या माथ्यानं काढायची - कुठून सुचतं हे?

मग सावकाश वसंताची चाहूल लागली की नव्या नवरीसारखं नटायचं, नव्या भिडूबरोबर भातुकली मांडायची. ती सजवायला हजारानी फुलं फुलवायची. त्यांच्यावर ती फुलांचं नाव सांगणारी पाखरं येणार, वेडे भुंगे घोंघावणार, मधचोख्या पक्षी भिरभिरणार.. त्यात कधी पाकळ्या गळणार, कुठल्या कळ्या कोमेजणार, पानं चुरगळणार, देठं मुडपणार.. पण खुळ्या फुलांना त्याचं काही नाही. उलट ती वेडी या सगळ्यांबरोबर नाचणार, नाचणार..

मग वा-याचा हात धरून तारुण्याचं गूज एकमेकांना सांगणार आणि तशातच एक दिवस त्यांची रसरशीत फळं होणार. दूरदेशातले कोणसेसे पक्षी येऊन त्यांवर ताव मारणार. कधीमधी त्यांच्या चोचींतून, पोटांमधून टणटणीत बिया कुठेकुठे जाऊन पडणार. मग उन्हाळ्यात जमीन खरपूस भाजून निघणार, त्यात त्या ताडताड तडकणार. आता त्यातल्या कितीतरी तडकतच नसतील, नुसत्या मातीमोल पडून राहात असतील - पण असल्या शंका त्यांना सतावत नसाव्यात.


मुळातच इवलं-इवलं मोजून काही करणं त्यांना पसंत नसावं. वाया जाणं, पडून राहणं, मातीमोल होणं - हे ही आम्हा गरिबांच्याच डोक्यातलं. एकामागून एक येत जाणा-या ह्या ऋतुचक्राचा कुठलाही कंटाळा येत नाही त्यांना. सगळं कसं नेमून दिल्याप्रमाणे चालू. गुदस्त सालासारखं ह्या साली. आखून दिल्यासारखं असलं तरी किती मनस्वी दिसतं सगळं.. मदमस्त वा-याबरोबर मोकाट खेळणा-या ढगांसारखं. (उगाच नाही गुरुदेवांनी म्हटलंय - पाखरं आणि ढग एकमेकांचा हेवा करतात म्हणून!) खळखळवेड वाहण्या-या झ-यालाही भौतिकीचे नियम असतातच की. म्हणावं तर बांधलेले आहेत हे सगळे, म्हणावं तर नाहीत. ती आखणी, ते नियम त्यांच्या पायांच्या बेड्या नाही होऊ शकत, पैंजणं होऊन जातात.

आणि ही झाडं-फुलं-फळं त्या सगळ्या भरडत्रासातून कशी विनातक्रार जातात! उन्हाच्या झळा झेलायच्या, गारठलेल्या अंगांनी थंडी काढायची, नव्या पालवीच्या वसंतवेणा सोसायच्या.. चक्रमेनिक्रमेण जगणं चालू. सगळ्याभर पसरलेल्या विराट विश्वाशी कसं घट्ट नातं आहे ना त्यांचं - गोल गोल फिरणारा कालसर्प, तसंच गोलाकार जगत जाणारी ही सगळी..

तुझ्यासारखीला त्यांचं हे जगणं इतकं सहज आणि उत्कटपणे समजत होतं, ह्यात काहीच नवल नाही वाटत आता. ही झाडं जशी त्यांच्या अंगाखांद्यांवर आवर्तकारी विश्वाचं छोटं रूप खेळवतात, तशीच तू - अक्षरश: स्वत:च्या आत वर्षानुवर्षं आर्तवचक्र वागवणारी. निसर्गाची चक्रीयता तुला मुद्दाम वेगळी थोडीच समजावून घ्यायला लागणार होती? कसं वाटायचं गं? नव्या जिवाला जन्म द्यायची शक्ती आपल्याच आत आहे हे पुरेपूर उमजल्यावर? हातांनी काहीबाही अचेतन वस्तू बनवायचा आनंद तेवढा मला माहीत.. पण सजीव, सचेतन, परिपूर्ण व्यक्तींची आई होताना कसं वाटलं असेल? कदाचित आम्हा पामरांना कधीच नाही कळायचं ते. मुळात कुठल्या सोशीक चक्राशी फारसा संबंधच नसतो आमचा. ना आर्तवचक्र, ना प्रसूतिवेणा. एखादा पाण्याचा हौद हळूहळू भरावा, एवढा एक भरल्यावर त्याचा नळ धो धो वाहत राहावा आणि मग पाणी सावकाश आटून जावं, तसे फुस्स संपून जातो आम्ही. एखाद्या सरळ ओढून संपणा-या रेघेसारखे, फार तर बाणासारखे.. चाकासारखे आवर्ती नाही.


.. मजाच आहे. तू होतीस तेव्हा तुझ्या डोळ्यांतून झाडं-फुलं दिसत-उमगत गेली, आता त्यांच्यामधून तू आकळत जातेयस.

पुढचा आवर्त कधी?


- मंदार.