Monday, February 27, 2006

एका लग्नाची गोष्ट

सुप्रभाती रोज जाई कर्ण गंगेच्या जळी,
अर्घ्य देई सूर्यदेवा रिक्त करि तो ओंजळी.

दान अर्घ्यांचे तयाचे आणि सूर्याराधना,
व्रतीसमान चालती कधीच त्यास खंड ना.

परन्तु एका प्रभाती क्रम तयाचा मोडिला,
"वाचवा! बुडते जळी !" आक्रोश त्याने ऐकिला.

गंगेवरी पाणी भराया ललना कुणी आली असे,
पडून तोल जाउनी मग दूर वाहत जातसे.

कानी पडे ती साद अन् क्षणही न कर्ण दवडि तो,
युवतीला वाचवुनी काठांवर आणि तो.

खोल पाण्याच्या भयाने हरपली शुद्धी जिची,
हळूच घाटावर नदीच्या ठेवि तो काया तिची.

युवती, अति सुन्दरशी, कर्ण पाहत राहिला,
क्षणकाल ते अर्घ्यदान, साधना तो विसरला.

आणुनी निमिषात अपुले उत्तरीय कोरडे,
पुसण्या मुख हळुच तिचे, कर्ण तेथे धडपडे.

जाग स्पर्शाने तयाच्या, सुन्दरीला येतसे,
पाहुन राजस रूप त्याचे लाजुन ती हासतसे.

एक क्षण कर्णास वाटे सर्व सृष्टी थांबली,
होता दृष्टादृष्ट त्यांची, गंगाही मनि हासली !

पळभरातच कन्यका ती येतसे भानावरी,
मंदसे स्मित मग करून निघुन जाई सत्वरी.

"अरे! उत्तरीय माझे, घेऊन गेली सुन्दरी!
काय म्हणतिल, परत जाता, लोक हस्तिनापुरी?"

'वृषाली' असे ती कुमारी सूतकन्या लाघवी,
कर्णपत्नी होतसे मग, अंगराज्ञिपद भूषवी.

कर्णाचे पण 'तोपर्यंत' लक्ष नाही लागले,
मुख वृषालीचेच त्या, रविबिंब भासू लागले !

-- मंदार.

( शिवाजीराव सावंतांच्या "मृत्युंजय" मधल्या परिच्छेदावर आधारित )

8 comments:

abhijit said...

अप्रतिम..

Mandar Gadre said...

धन्यवाद, अभिजित !

Anonymous said...

Mast aahe kavita
Mangesh

Anonymous said...

mala eka lagnachi Gohsta aavdli

mangesh bhujbal

Kaustubh said...

सुंदर.

Anonymous said...

खूपच सुंदर कविता! आवडली.

Anand Sarolkar said...

Amazing poem...vachtana vatlach ki hi kavita Mrityunjay var aadharit aahe mhanun!!! I think you should be nick named "Chota Shivaji"...Great work!

Sandeep Limaye said...

hi mandar...

khoopach chhan ahe kawita. mrutyunjay me wachlela ahe, so i think i could appreciate it even more.